दिपावलीचा प्रारंभ...

धर्म संस्थापनार्थाय... बांधीलकी सांगणाऱ्या श्रीकृष्णाने द्वापारयुगात धर्मस्थापनेसाठी कंस वध करून पशुत्वाचा नाश केला. जिथे जिथे मानवतेवर अत्याचार होणार तिथे तिथे त्या पशुत्वाचा संहार श्रीकृष्ण करणार हे निश्चितच होते. श्रीकृष्णाचे राज्य द्वारकेत स्थीरस्थावर होत नाही तोच नरकासुराच्या स्त्री-सौंदर्यांच्या लुटालुटीच्या कुवार्ता भगवंताच्या कानावर पडू लागल्या. स्त्रीयांना उपद्रव देणे, त्यांची विक्री करणे इत्यादी अधम, नीच कृत्ये मुर नावाचा नरकासुराचा सहकारी करत असल्याने स्त्री जातीवरील या महाभयंकर संकटाचे निराकरण करणे अत्यावश्यक होते.
सोळा सहस्त्र एकशे स्त्रीयांना बंदीगृहात ठेवणाऱ्या नरकासुरावर श्रीकृष्णाने स्वारी केली. झालेल्या घनघोर युद्धात मुर, पंचजन, हरग्रीव, निसुंद या सहकाऱ्यांसह नरकासुराला श्रीकृष्णाने ठार केलेे
सोळा सहस्त्र एकशे स्त्रीयांची बंदीगृहातून श्रीकृष्णाने मुक्तता केली. दुष्ट आक्रमकांच्या तावडीतून सोडविलेल्या या सर्व शालीन कुलीन घरातील स्त्रीयांचे काय करायचे हा यक्ष प्रश्न निर्माण झाला. अशा स्त्रीयांना आपल्यात सामावून घ्यायची बऱ्याच पालकांची तयारी नसल्याने तसेच ज्यांची तयारी आहे त्यांच्यापुढे त्यांच्याशी विवाह कोण करणारा हा जटील प्रश्न असल्याने त्या स्त्रीयांपुढे फक्त दोनच पर्याय शिल्लक होते, १) आत्महत्या २) वेश्याव्यवसाय. त्यामुळे मुक्त झालेल्या सर्व स्त्रीया श्रीकृष्णाला आपल्याशी विवाह करण्यासाठी ऋषीमुनींच्या भविष्यवाणीचा दाखला देत विनवू लागल्या. (नरकासुराचा वध करणारा तुमचा स्वामी असेल अशी ऋषीमुनींनी भविष्यवाणी केली होती).
सोळा सहस्त्र एकशे स्त्रीयांना सन्मानाचे, प्रतिष्ठेचे सुरक्षित जीवन जगता यावे म्हणून श्रीकृष्णाने सर्वांना द्वारकेत नेऊन त्यांच्याशी विधीवत विवाह केला. भोगविलासा सारखे कोणतेही कुकृत्य न करता सर्वांचा सांभाळ त्या हरीने केला. त्यामुळे एका अर्थाने आमचा आद्यसमाजसेवक, आद्यसमाजसुधारक असल्याचा मान हा खरे तर श्रीकृष्णाकडेच जातो. श्रीकृष्णाच्या या अद्वितीय कार्याला धर्मद्वेषी मंडळींनी भोगविलासाचे कीतीही गालबोट लावले तरीसुद्धा त्याचे ते कार्य डागाळले जात नाही.
श्रीकृष्णाला म्हणूनच पुर्णावतार म्हटले आहे. इतर सर्व अंशावतार तर श्रीकृष्ण पुर्णावतार असल्याचा उल्लेख श्रीमद्-भागवतात प्रथम स्कंध अध्याय ३ मध्ये आपल्याला वाचायला मिळतो. नरकाुसराचा वध केल्यानंतर बंदीगृहातून मुक्त झालेल्या सोळा सहस्त्र एकशे स्त्रीयांनी दिव्य तेजाने नटलेल्या तेजःपुंज श्रीकृष्णाला ओवाळले तोच तो नरकचतुर्दशीचा दिवस आपण दिवाळीचा पहीला दिवस म्हणून साजरा करतो. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे चार दिवस दिवाळी ज्या पुर्णावतारी श्रीकृष्णामुळे साजरी होऊ लागली, त्या दिवाळी निमित्त त्याचे सुद्धा स्मरण व्हावे यासाठी हा भावबंध प्रपंच.
शब्दभावबंध - चेतन (चैतन्य) लट्टू
Sunday, 25 October 2020

No comments:

Post a Comment